Sunday, 18 December 2016

महाराष्ट्र राज्याविषयी माहीती

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती

👉 स्थापना-  *01 मे 1960*
👉राजधानी - मुंबई
👉 राज्यभाषा - मराठी
👉🏼एकूण जिल्हे - *36*
👉 एकूण तालुके-  *355*
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
(355 + 3 = 358)
👉🏼 ग्राम पंचायत -  28,813
👉 पंचायत समित्या *355*
👉 एकूण जिल्हा परिषद- *34*
👉 आमदार विधानसभा  288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा- 720 किमी
👉 नगरपालिका- 226
👉 महानगरपालिका- *27*
27 वी मनपा *पनवेल* 1oct 2016
👉 शहरी भाग - 45.2 %
👉 ग्रामीण भाग 55 .8 %
👉 लोकसंख्या बाबतीत *2* रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात *3* रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा *9.36* % *प्रदेश* व्यापला आहे
👉🏼 महाराष्ट्राची *घनता 365*
👉🏼देशातील *9.29*% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - *पुणे*  ( 94.3 लाख )
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - *सिंधुदुर्ग* (8.50 लाख)
👉 संपुर्ण *साक्षर* 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी *साक्षर* जिल्हा
जनगणना 2011नुसार *नंदूरबार* 64.4 %
2014  पासुन *पालघर* *57.14 %*
👉🏼MH *लिंग गुणोत्तर*  - 929
👉🏼सर्वाधिक रत्नागिरी - 1122
👉🏼MH *बाल लिंग* गुणोत्तर - 894
👉🏼सर्वाधिक पालघर - 967
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वात जास्त *निरक्षर* लोक *पुणे* जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.

👉🏼 अनुसुचित जाती *पुणे* प्रथम क्रमांकावर
👉🏼 अनुसुचित जमाती *नाशिक* प्रथम क्रमांकावर

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - *अहमदनगर*
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - *मुंबई शहर*
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर  *कळसूबाई* (1646मी)
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉🏼 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - *रत्नागिरी*
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - *नागपुर*
(Oct 2016)

Thursday, 1 December 2016

महत्वाचे दिनविशेष..

महत्वाचे दिनविशेष...
============
सर्वांना पाठवा....

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
Please forward...

नाना पाटेकरांच्या शब्दात त्यांच्या अनुभवाचे गुरू(अप्रतीम लेख)

दोन गुरू (अपमान आणि भूक):
नाना पाटेकर
--------------

वयाच्या तेराव्या वर्षी,1963 ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं.रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती.
कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता. रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई- वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.

अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो
वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी. नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही. भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा
जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई- वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता. मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.

सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की
संशय येतो. अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे. माझी सगळयात गोड मैत्रीण भूक काय नाही दिलं या मैत्रिणीनं? त्या वयातला तो अप्रतिम प्रवास. पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं! सारी शिकवण पोटातून. माझ्या पौडांगवस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात. खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती. गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव
उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले. डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं
लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती. माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला
गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.

भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव. हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा. त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही. खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं. रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम. मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम. या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क. माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला. (भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)

अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ- संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले. ‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च
शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्याला सुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली. प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला. अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला. उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं. उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान. आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय. ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर. आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय. अजून पुढचा तीर असेल कदाचित. आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.

.....- नाना पाटेकर......

Sunday, 27 November 2016

*गणिताची भीती कशी घालवावी व गणित शिकवणे रंजक कसे करावे

♦ *गणिताची भीती*

Maharashtra Times | Nov 26, 2016, 06:13 PM IST

​ गणिताची भीती​ गणिताची भीती
किरण बर्वे

बहुसंख्य भारतीय मुलांच्या मनात गणिताची भीती कायम वस्तीला असते. ती दूर करण्याचे विशेष प्रयत्न आपल्या शिक्षण पद्धतीत झाले नाहीत. मात्र, नुकताच ही भीती घालविण्यासाठी इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता मणीमाळ, ठोकळे, नाणी-नोटा, गणितीय जाळी अशा साहित्याचा शिक्षणात वापर करावा, असं राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केलं आहे. या निमित्ताने या भीतीचा घेतलेला मागोवा-

गणिताची भीती खूप मुलांच्या मनात असते. ढोपर फुटू दे, पोटात दुखू दे, पण गणिताचा पेपर द्यायला नको, इतकं दडपण असतं ही वस्तुस्थिती आहे. ही भीती का, कशी निर्माण होते हे समजावून घेत त्यावर मात कशी करायची हे आपण बघू या. भीती ही कधीही उपजत नसते ती acquired, ग्रहण केलेली असते. परिस्थिती, स्वानुभव आणि मोठ्या वा आजूबाजूच्या लोकांचे अनुभव गोळा करत एखाद्या गोष्टीची भीती बाळगायला आपण शिकतो. गणिताचा तास रूक्ष, कंटाळवाणा असतो हे दादाचं मत, एकदाचं गणितात पास होऊ दे, असं कोणी इंजीनियर होणारी हुशार ताई प्रार्थना करताना ऐकलेलं असतं. आजूबाजूचं वातावरण असं असतं. त्यात गणित शिकायची सुरुवात कंटाळवाणी, नीरस होत असेल तर मनात अढी तयार होते. किती मार्क मिळतील ही धास्ती वाटायला लागते. आपण गणिताची भीती मनाशी बाळगायला लागतो.

आपण माहीत असलेल्या गोष्टीतूनच, त्यांचा आधार घेत नवीन गोष्टी शिकत असतो. भाषा, सामान्य ज्ञान यांची ओळख खूप लहानपणापासून, आपसूक होते. त्या असलेल्या माहितीत वाढ करून, तिला नेमकेपणा आणून हे विषय शिकवले जातात. गणित शिकवताना हे खूपच कमी प्रमाणात होतं. गणितात अमूर्त कल्पना असतात, आणि गणित आपल्या नेहमीच्या भाषेत लिहिलं जात नाही, ते विविध चिन्हांद्वारे लिहिलं जातं. त्यामुळे गणित अत्यंत अवघड आहे असं समजलं जातं, तसं बोललंही जात असतं. पण एखादी कल्पना सुचते तेव्हा ती निसर्गातील वस्तूंच्या निरीक्षणातून, घडामोडीतून, तसंच व्यवहारातून स्फुरलेली असते. ती अधांतरी नसते. गणितसुद्धा आजूबाजूच्या व्यवहारात असतं, patterns दिसत असतात, जाणवत असतात. पण ह्या निरीक्षणांचा माहितीचा सांधा गणित शिकवताना सजगपणे जुळवला जात नाही. गणितातील संकल्पना व्यवस्थितपणे विविध कृती, आजूबाजूला दिसणाऱ्या गणिती गोष्टींतून सांगून पूर्वतयारी करायला हवी. आज मात्र गणित शिकण्याची सुरुवात अंक आणि त्यांचे उच्चार, चिह्नं माहीत होणे, काढणे ह्या धडक मोहीमेने केली जाते. शिकवायचा भर मुलांकडून अंकाचे उच्चार घोकून घेणं हाच असतो. त्यानंतर अंक दर्शवणारी चिह्नं घोटवून घेतली जातात. १ ते १० अंक बिनचूक म्हणून लिहून दाखवणारा हुशार, अन्य जरा कमीच असा माहोल तयार होत जातो. मोजण्याची कल्पना मुलांच्या मनात रुजलेली नसल्यामुळे असे अंक असण्याची गरज समजलेली नसते. अंक, त्यांची चिह्नं परकी वाटतात. परक्या वाटणाऱ्या गोष्टीचा माझ्या लायकीशी, हुशार-ढ असण्याशी लावला जाणारा संबंध मुलांसाठी त्रासदायक असतो. बहुतेकदा विद्यार्थी आणि गणिताची पहिली भेट निराशाजनक, गणिताविषयी चुकीचे ग्रह निर्माण करणारी होते. इथेच गणिताच्या भीतीची सुरुवात होते. गणित शिकण्याची, मोजणे शिकण्याची सुरुवात कशी असावी? गणितातील कोणताही विषय शिकवताना संकल्पनांची चर्चा, त्या समजावणं महत्त्वाचं, हे लक्षात घेणं जरुरीचं आहे. चांगली पूर्वतयारी करून कल्पना समोर आणाव्यात, नंतर कल्पना मांडण्यासाठी लागणारी चिह्नं, क्रिया, समीकरणात रूपांतर, करीत शिकवावं. कोणताही विषय ह्याच पद्धतीने शिकवला जायला हवा. मोजणं कसं शिकवावं हे समजून घेताना हा मुद्दा स्पष्ट होईल. दोन गटातील वस्तू जर एकास एक जुळवता आल्या तर त्या दोन गटात सारखे नग आहेत, ही कल्पना म्हणजे मोजणं. विविध वस्तूंच्या गटांत एकास एक संगती जुळवणे, काही फुलांच्या पाकळ्यांची संख्या सारखी असते तर, काहींच्या पाकळ्यांची संख्या वेगळी असते. दोन फुलांच्या पाकळ्या एकामेकांशी जुळवताना, कधी पाकळ्या बरोबर एकावर एक जुळतील, केव्हा तसं जमणार नाही. असे खेळ घेऊन कल्पना विस्तार करून कल्पना रुजवावी. अंकांचे उच्चार, चिह्नं सांगण्यापूर्वी पायाभरणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर मग हळूहळू अंक, चिह्नं शिकवावीत. त्यांचा सांधा अगोदरच्या खेळांशी जोडावा. गणित शिकवताना कल्पना स्पष्ट करणे, कृती करून घेणे ही पद्धत गणिताबद्दलचा दुरावा, नावड दूर करण्याचा प्रमुख उपाय आहे.

गणितातील भीतीचं अजून एक कारण म्हणजे उदाहरणं सोडवताना करायची आकडेमोड. आकडेमोड करतानाची एकही चूक माफ करता येत नाही. कारण उदाहरणाचं उत्तर चुकतं. आलेलं उत्तर एक तर बरोबर असतं किंवा चूक, त्यात जरासुद्धा बदल होत नाही, ही समजूत आणि त्यानुसार दिले जाणारे गुण. खूपदा मुलगा शिक्षकांकडे जातो आणि तक्रार करतो, मला हे गणित आलं आहे. त्याने लिहिलेलं उत्तर बरोबर नसतं, पण तरीही मुलाला पटत नसत की त्याला गणित सोडवता आलेलं नाही. गंमत अशी झालेली असते, मुलाला गणित समजलेलं असतं, ते ज्या कल्पनेवर आधारलेलं आहे तीच कल्पना त्याने वापरलेली असते. रीत सुद्धा योग्य असते. मात्र आकडेमोड करताना एक पायरी जरा हुकलेली असते. परिणामी त्याला शून्य मार्क मिळालेले असतात. इतर विषयांत उत्तरातील चारातील तीन मुद्दे बरोबर असतील तर सहजी निम्म्यापेक्षा जास्त गुण मिळतात आणि गणितात मात्र तसे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही मला शून्यच गुण दिलेत, ही मुलाची तक्रार रास्तच असते. ही तक्रार करायची वेळ येते, कारण अंतिम उत्तराला दिलं जाणारं अवास्तव महत्त्व. त्यामुळे गणित म्हणजे जणू काही आकडेमोड असं बिनडोक समीकरण तयार केलं जातं. खरंतर ज्या वेळेला आपण गणित सोडवत असतो त्या वेळेला ती संकल्पना समजणं आणि त्यानुसार योग्य रीतीने बरोबर उत्तर काढणं हे दोन टप्पे असतात. हे टप्पे वेगवेगळे तपासता येतील, असे प्रश्न तयार करणं आवश्यक आहे. अन्यथा उदाहरण सोडवताना दडपण यायला लागतं. उदाहरणाने लक्षात येईल. २४ आणि ६०चा ल.सा.वि. काढायचा आहे. २४ आणि ६०चे अवयव पाडणे ही पहिली पायरी, मग २४ = २ x २ x २ x ३, ६० = २ x २ x ३ x ५ असे बरोबर अवयव पाडणे ही दुसरी पायरी. दोन्ही संख्यांत असलेले सामायिक अवयव एकदाच घेणे आणि दोन्ही संख्यांचे उरलेले अवयव गुणाकार करण्यासाठी लिहिणे ही तिसरी पायरी आणि त्यांचा गुणाकर करून ल.सा.वि. काढणे ही शेवटची. ह्या प्रत्येक पायरीचं मूल्यमापन केलं तर दिले जाणारे गुण योग्य असतील. तपासून आलेलं उत्तर वाचताना मी काय चांगलं केलं आणि सुधारणा कोणती करायची हे समजेल. गणिताच्या अभ्यासात आकडेमोडीला योग्य तितकं महत्त्व आहे. वरील उदाहरणातही आकडेमोड आवश्यक होती, पण तिला असलेलं महत्त्व योग्य तितकंच दिलं गेलं. आकडेमोड वेगात आणि बिनचूक करता येण्यासाठी १ ते २० पर्यंत पाढे यायला हवेत. एक-दोनदा पाढे मोठ्याने म्हणायचे, नंतर पाढे वापरून आकडेमोड करत गणितं सोडवावी. सुरुवातीला पाढे तक्त्यात बघून गणितं सोडवायचा सराव केला की. पाढे पाठ होतात. आकडेमोड अचूक होते. आत्मविश्वास वाढून गणिताशी मैत्री व्हायला लागते.

आज गणिताच्या एका महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष होत आहे. दैनंदिन व्यवहारातील उपयोग, ज्ञान-विज्ञानाची भाषा ह्यासाठी गणित शिकवलं जातं. मात्र गणिताच्या अभ्यासातून तर्कशुद्ध विचार करायची क्षमता विकसित करायची असते, ह्याचा विसर पडला आहे. तर्कशुद्ध विचार करायला शिकण्याचा अत्यंत सोपा आणि मनोरंजक मार्ग म्हणजे कोडी सोडवणे. शाळेत कोडी सोडवण्यासाठी आवर्जून वेळ दिला पाहिजे. सुडोकु, जिग-सॉ, विशिष्ट गुणधर्माच्या संख्या शोधा, तुमचं नाव सरळ रेषांनी काढलं तर किती वेळा वळायला लागेल? इत्यादि कोडी मुलं मनापासून सोडवतात. कोड्यांवर विचार करताना बुद्धी विकसित होते आणि गणितच नव्हे तर इतरही विषयांतील रस आणि गुणवत्ता वाढते. गणितात कोडी सोडवताना एकमेकांशी गप्पा होतात गणितातील मौज जाणवते.
प्रत्यक्षात ह्या पद्धतीने शिकवताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. शिक्षकांच्या क्षमतांचा विकास करणं गरजेचं आहे. गणितातील कल्पना मलाच पुरेशा स्पष्ट नाहीत, असं सांगणारे शिक्षक आहेत. त्याहूनही जास्त शिक्षक असे आहेत की ज्यांच्या संकल्पना स्पष्ट नसतात आणि ते त्यांनाच माहीत नसतं. ते शिकले त्या वेळी, त्यांना गणितातल्या कल्पना स्पष्ट करून व्यवस्थित शिकवलेल्या नसतात. कृतीतून शिकवणं, खेळ घेणं, हेसुद्धा मग काहीसं उपचार म्हणून केलं जातं. गणित शिकवणाऱ्या शिक्षकांतील सुमारे ९५% शिक्षक १२वी नंतर गणित शिकलेले नसतात. त्यामुळे जाणत्या वयात गणितातील संकल्पनांवर विचार करायची संधी त्यांना मिळालेली नसते. सातत्याने शिक्षकांना प्रत्यक्ष वा ऑनलाइन प्रशिक्षण दिलं पाहिजे. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष शिकवताना काही लिखित साहित्य शिक्षकांपाशी असणं उपयुक्त ठरेल. अभ्यासक्रमातील जी कल्पना शिकवायची आहे तिचा उगम, व्यवहारातील उपयोग, शिकवायची पद्धत, खेळ, आधारित कोडी असा सखोल दृष्टिकोन विकसित करणारं लिखाण तयार करायची आवश्यकता आहे. प्रत्येक इयत्तेसाठी हा ‘गणिताचा वाटाड्या’ शिक्षकांना दिला जावा, तसंच तो विक्रीलाही असावा. ज्यांना ज्यांना गणित समजावून घेऊन शिकायचं, शिकवायचं आहे त्या सर्वांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. शिकवायच्या मुद्द्यांसंबंधी अधिक माहिती शिक्षकाजवळ असेल. तरच तो गणितातील त्या मुद्द्याबद्दल गप्पा मारू शकेल. वर्गात गणिताविषयी शिक्षक बोलत आहेत, मुलं प्रश्न विचारत आहेत, स्वतःची निरीक्षणं मांडत आहेत असं चैतन्यमय, उत्साहाचं, आनंददायी वातावरण निर्माण होईल. गणिताबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल. गणिताचा अभ्यास उत्कंठापूर्ण, गंमतीचा तरीही गांभिर्याने व्हायला सुरुवात झाली की मग गणिताच्या भीतीलाच विद्यार्थ्यांजवळ यायला भय वाटू लागेल!

(लेखक प्रसिद्ध गणिती असून त्यांनी २०१४ सालच्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये भारतीय संघाचं उपकप्तानपद भूषवलं होतं.)