Wednesday, 23 November 2016

हवे तेवढे पैसे छापून, देश श्रीमंत का होऊ शकत नाही?

*चलनात जितका जास्त पैसा तितके त्या पैशाचे मुल्य कमी होते अर्थातच महागाई वाढते.*

Currency Printing,
HYPERINFLATION, Income,

गरिबी हे केवळ आपल्याच नाही तर जगातील कित्येक देशांना लागलेलं ग्रहण आहे. जगात असे अनेक देश आहेत
ज्यांची परिस्थिती पाहता लक्षात येते की भारतात आपण कैक पटीने सुखी
आहोत. ‘देश गरीब’ म्हणजे त्या देशाकडे पैसे (सरकारी खजिन्यात!) नसणे
किंबहुना तेथील नागरिकांकडे पैसे नसणे. अनेकांच्या मनात सहज विचार येतो, की प्रत्येक देशाचं एक वेगळं चलन
असतं आणि त्या चलनाची छपाई त्या देशातच होत असते. म्हणजेच स्वत: पैसे
छापून देखील तो देश किंवा तेथे राहणारी जनता गरीब का? प्रत्येक देशाकडे पैसे छापणारी मशीन असताना
देश हवे तेवढे पैसे छापून लोकांमध्ये का नाही वाटत? म्हणजे आपसूकच देश श्रीमंत होईल नाही का? असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि ते येणं साहजिकच आहे म्हणा, पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे –

*"मुळीच नाही…हवे तेवढे पैसे छापून कोणताही देश श्रीमंत होऊ शकत नाही…”*

हे खरं आहे की मंदीच्या काळात देश अधिक नोटांची छपाई करतात. पण ते
देखील तेव्हाच केले जाते जेव्हा अतिशय गंभीर स्थिती उद्भवते. परंतु असे करणे
देखील देशाच्या आर्थिक
स्थितीसाठी धोकादायक ठरते कारण प्रमाणापेक्षा जास्त चलन छापल्यास चलनवाढ होऊन पैशाचे मूल्य कमी होऊन देशात तीव्र क्षमतेची महागाई निर्माण होऊ शकते.
अश्या परिस्थितीचे सर्वात उत्तम उदाहरण पहायचे झाल्यास आपण ‘झिम्बाब्वे’ कडे पाहू शकतो.

२००० साली या देशाची
महागाई वर्षाला २३१ दशलक्ष टक्के (२३१,०००,०००%!!!) इतकी वाढली.

‘झिम्बाब्वे’ सरकारने २,००,००० डॉलरच्या नोटेची छपाई सुरु केली. गंमत
म्हणजे याची किंमत आपल्याकडच्या २ रुपयांएवढीच होती. त्या नंतर २२ डिसेंबरला त्यांनी ५,००,००० डॉलरची नोट बाजारात आणली. त्यानंतर आली ७,५०,००० डॉलरची
नोट…!

झिम्बाब्वे सरकारचा Economic मुर्खपणा इथेच थांबत नाही…जानेवारी
मध्ये तर झिम्बाब्वे सरकारने कहर करत १० मिलियन अर्थात १० दशलक्ष
डॉलरची नवी नोट बाजारात आणली. पण गंमत म्हणजे आपल्याकडे असणारी
५०० रुपयांची नोट देखील या १० दशलक्ष डॉलरच्या नोटीपेक्षा १० पट मौल्यवान होती. म्हणजेच तुमच्याकडे
६५ बिलियन झिम्बाब्वे डॉलर असतील तरी त्याची भारतातील किंमत केवळ
१३,००० ते १४,००० रुपयांच्या आसपास असणार. म्हणजे नावाचाचं बिलीयेनियर – खिशात मात्र केवळ
हजारच! तेव्हा झिम्बाब्वेचा चलन एक्सचेंज रेट होता १ डॉलर साठी २५ मिलियन
झिम्बाब्वे डॉलर…!

पहा हा शर्ट किती स्वस्त
आहे ना..किंमत केवळ ३
बिलियन डॉलर…!

अखेर आली सर्वात मोठी
१०० बिलियन डॉलरची
नोट. पण दुर्दैव हे की या
१०० बिलियन डॉलरमधून
झिम्बाब्वेची जनता खरेदी
करू शकत होती केवळ ३
अंडी!

पाहिलंत…जेव्हा एखादा
देश हवे तेवढे पैसे छापतो
तेव्हा त्याचा ‘झिम्बाब्वे’
होतो…!

आता प्रश्न हा आहे की केवळ अमर्याद नोटा छापल्याने ही महागाई कशी निर्माण होईल?
जर सरकारने हवे तेवढे पैसे
छापले आणि जनतेमध्ये
वाटले तर त्याचा नेमका
काय परिणाम होईल? जेव्हा तुमचं उत्पन्न वाढतं, तेव्हा तुमचा खर्च वाढतो आणि ‘स्टेटस’ नुसार गरजा
देखील वाढतात. आता असा विचार करा की तुम्ही
टीव्हीवर बातम्या बघत बसला आहात आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज येते की सरकारने प्रत्येक नागरिकाला १ करोड
रुपये वाटण्याचा निर्णय घेतला आहे – जेणे करून सर्वजण आरामात खाऊन-पिऊन सुखी राहू शकतील. दुसऱ्याच क्षणी तुम्हाला मेसेज येतो की
तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून १ करोड रुपये क्रेडीट केले गेले आहेत. बस्स!
मग काय आनंदी आनंद गडे…जिकडे तिकडे चोहीकडे…तुम्ही झटक्यात करोडपती झाला आहात. आता तुमच्या मनात विचार
येईल ‘आता तर मी श्रीमंत झालो आहे, हवी ती वस्तू मी खरेदी करू शकतो’…आणि तुम्ही सरळ शॉपिंग करण्यासाठी धावत सुटाल.
नेमका हाच विचार प्रत्येक माणूस करेल. अचानक वस्तूंची मागणी वाढेल कारण
– आता प्रत्येकाकडे पैसे आल्याने प्रत्येक जण खर्च करण्यासाठी उतावीळ आहेत.
पण याचवेळी, आपल्या चलनाचे मूल्य झटक्यात कोसळेल.
चलनाचे मूल्य काय असते? ते
का बरं कोसळेल?

अजून सोप्प करून सांगतो.
समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे. पूर्वी त्या घराची किंमत होती ३० लाख रुपये. परंतु तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते.
पण आता सरकारकडून १ कोटी रुपये मिळाल्याने तुम्ही थेट त्या बिल्डरकडे
धाव घेतली आणि – पाहता तर काय तुमच्यासारखे हजारो जण त्या घराबाहेर उभे
आहेत…! प्रत्येक जण ओरडतोय “मला घर द्या…
मला घर द्या…!” एवढी गर्दी पाहून एरव्ही बिल्डर घाबरला असता. पण संख्येने थोड्याच असलेल्या घरासाठी हजारो लोक भांडत असल्याचे पाहून
तो खुश होतो आणि सरळ घराची किंमत वाढवून ७५ लाख करतो.

मागणी वाढली की किंमत वाढते, या उदाहरणावरून तुम्ही बाजारातील प्रत्येक वस्तूच्या भरमसाठ वाढणाऱ्या किंमतीचा अंदाज बांधू शकता. थोडक्यात – Demand-Supply,
मागणी-पुरवठा – चा नियम.

मागणी वाढली म्हणजे त्याचा
आपसूकच परिणाम किंमतीवर होतो आणि मागणी सोबत किंमत देखील वाढीस लागते. लोकांना वाटेल की पैसे आल्यामुळे ते श्रीमंत झाले आहेत. परंतु त्यांच्या हे
ध्यानी येण्यास वेळ लागेल की
त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा ज्या वस्तूची किंमत केवळ १०० रुपये होती ती
वस्तू आता ५०० रुपयांची झाली आहे. महागाई वाढल्याने लोकांचा पैसा
देखील लवकर संपेल आणि परिणामी महागाईमुळे अत्यंत हलाखीची गरिबी निर्माण होईल. म्हणजे जिथून सुरु केलं तिथेच येऊन थांबण्यासारखं आहे…हे पाहून सरकारने पुन्हा पैसे छापले आणि पुन्हा लोकांमधे
वाटले की स्थिती अधिकच बिकट होणार. मग दिलेल्या १ करोड रुपयांना प्रत्यक्षात १०,००० रुपयांची देखील किंमत राहणार नाही…!
याउलट, ज्या देशातील
लोक ५० रुपये किलोच्या
जागी ५ रुपये किलोने
बटाटे विकत घेत असतील तर
तो देश खरा श्रीमंत आहे.
म्हणजेच लोकांचा पैसा
त्या देशातील सरकार
योग्य त्या प्रकारे वापरत
आहे. पण सरकारने जर वरीलप्रमाणे नोटा छापून जास्त चलनवाढ केली तर
मात्र लोकांना १०० रुपये किलोने बटाटे विकत घ्यावे लागतील. आणि ते देशाच्या हिताचे नक्कीच नसेल…!

*ज्याप्रमाणे विजचोरीचा त्रास समायोजन अधिभार रूपाने इतर सर्व प्रामाणिक ग्राहकांना बसतो, त्याचप्रमाणे बेकायदेशीरपणे चलनात असलेल्या काळ्या पैशामुळे वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो.*

No comments:

Post a Comment